
बारामती : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज बारामतीमध्ये पत्रकारांशी बोलताना सुनेत्रा पवार यांच्या उपमुख्यमंत्री पदाच्या शपथविधीबाबत स्पष्ट प्रतिक्रिया दिली. त्यांनी सांगितले की, या शपथविधीबाबत त्यांना कोणतीही पूर्वकल्पना नव्हती आणि ही माहिती त्यांना माध्यमांमधूनच समजली.
शरद पवार यांनी नाराजी व्यक्त करताना सांगितले की, हा निर्णय घेताना पवार कुटुंबाला विश्वासात घेतले गेले नाही. त्यांनी हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचा असावा, असेही सूचित केले. प्रफुल्ल पटेल किंवा सुनील तटकरे यांसारख्या नेत्यांनी पुढाकार घेतला असावा, असे त्यांनी नमूद केले.
दरम्यान, अजित पवार यांच्या २८ जानेवारी रोजी बारामती येथे झालेल्या विमान दुर्घटनेत निधनानंतर उपमुख्यमंत्रिपद रिक्त झाले होते. त्यानंतर सुनेत्रा पवार यांचे नाव पुढे आले असून त्या आज (३१ जानेवारी २०२६) संध्याकाळी सुमारे ५ वाजता उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर आली आहे.
सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री ठरू शकतात, अशीही चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.
पत्रकारांनी कुटुंबातील कोणी शपथविधीला जाणार का असा प्रश्न विचारल्यावर शरद पवार यांनी मिश्किलपणे, “मी तर इथे (बारामतीत) आहे, मग कसा जाणार?” असे उत्तर दिले.