
पुणे दि. 16 : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जाहीर झाल्यानंतर जनतेचा कौल हा सर्वोच्च असल्याचे स्पष्ट करत तो पूर्ण आदराने स्वीकारत असल्याची प्रतिक्रिया अजित पवार यांनी व्यक्त केली आहे. विजयी झालेल्या सर्व उमेदवारांचे मनापासून अभिनंदन करत त्यांच्या यशस्वी कार्यकाळासाठी शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.निवडणुकांमध्ये ज्या ठिकाणी अपेक्षित यश मिळाले नाही, तेथे जनतेचा विश्वास पुन्हा मिळवण्यासाठी अधिक जबाबदारीने, प्रामाणिकपणे आणि दुप्पट जोमाने काम केले जाईल, असा ठाम विश्वासही अजित पवार यांनी व्यक्त केला आहे.विजयी उमेदवारांनी आपापल्या महानगरपालिकांमध्ये जनतेच्या प्रश्नांना प्राधान्य देत विकास आणि लोककल्याणाच्या कामांना गती द्यावी, अशी अपेक्षाही पवार यांनी व्यक्त केली आहे. तसेच, जे उमेदवार विजयी होऊ शकले नाहीत, त्यांनी निराश न होता जनतेसाठी कार्यरत राहावे, केंद्रस्थानी नेहमी जनतेचे भले ठेवून अखंड सेवा करावी, असे आवाहनही केले आहे.लोकशाही प्रक्रियेत विजय-पराजय हा प्रवासाचा भाग असून जनतेसाठी सातत्याने काम करणे हेच अंतिम ध्येय असल्याचे या प्रतिक्रियेतून स्पष्ट होते.