
पुणे : आजवर २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला असून, पुढील टप्प्यात ज्येष्ठ नागरिकांच्या तातडीच्या सेवेसाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ थेट त्यांच्या दारी जाऊन काम करणार आहे, अशी घोषणा राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी केली. प्रभाग क्रमांक २५ मधील प्रचारादरम्यान नागरिकांशी संवाद साधताना त्यांनी हा शब्द दिला.
प्रभाग क्रमांक २५ – शनिवार पेठ आणि महात्मा फुले मंडई परिसरात ज्येष्ठ नागरिकांची संख्या मोठी आहे. त्यांना घराबाहेर पडणे अनेकदा कठीण जाते. ही बाब लक्षात घेऊन ड्रेनेज, पाणीपुरवठा, स्वच्छता, आरोग्य आदी तातडीच्या समस्या घरपोच सोडवण्यासाठी ‘फिरते समस्या निवारण कार्यालय’ सुरू करण्यात येणार आहे. हेल्पलाईन क्रमांकावर समस्या नोंदवल्यानंतर संबंधित परिसरात तातडीने भेट देऊन काम केले जाईल.
समस्या निराकरणास वेळ लागणार असल्यास, प्रत्येक टप्प्यावर नागरिकांना माहिती दिली जाईल, असेही मानकर यांनी स्पष्ट केले. “माझ्या २४ तास जनसेवा कार्यालयाच्या माध्यमातून सुरू असलेल्या सेवांचा हा पुढचा टप्पा आहे. नागरिक मला लोकप्रतिनिधीपेक्षा ‘सेवक’ म्हणून निवडणार आहेत आणि त्याच भावनेतून निस्वार्थ सेवा करण्याचा माझा पक्का निर्धार आहे,” असे बाप्पु मानकर म्हणाले.
सध्या ते घरोघरी जाऊन नागरिकांशी थेट संवाद साधत असून, २४ तास जनसंपर्क कार्यालयामुळे हजारो नागरिकांच्या समस्या सुटल्याने मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळत असल्याचेही त्यांनी सांगितले.
दरम्यान, राघवेंद्र बाप्पु मानकर यांच्यासह स्वरदा बापट, कुणाल टिळक आणि स्वप्नाली पंडित हे भाजपाचे अधिकृत उमेदवार प्रभागात घरोघरी भेटी देत नागरिकांशी संवाद साधत आहेत.