
पुणे : महापालिका निवडणुकीच्या प्रचाराला सध्या वेग आला असून औंध–बोपोडी प्रभाग क्रमांक ८ मध्ये भारतीय जनता पक्ष–रिपब्लिकन पक्ष (आठवले) युतीचे उमेदवार चंद्रशेखर उर्फ सनी विनायक निम्हण यांचा प्रचार जोमात सुरू आहे. प्रचारादरम्यान त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधत लोकांच्या भावना समजून घेऊनच विकासकामे राबवली जातील, असे स्पष्ट केले.भारतीय जनता पक्ष विकास करताना नेहमीच लोकांना केंद्रस्थानी ठेवतो. त्यामुळे कस्तुरबा वसाहत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर वसाहतीच्या विकासासाठी स्थानिक नागरिकांच्या अपेक्षा आणि भावना लक्षात घेऊनच निर्णय घेतले जातील, असे निम्हण यांनी सांगितले.निम्हण यांच्या प्रचारानिमित्त औंध परिसरात भव्य पदयात्रा काढण्यात आली. ही पदयात्रा कस्तुरबा वसाहत, जगदिश नगर, कांबळे वस्ती, संजय गांधी वस्ती तसेच स्पायसर वस्ती या भागांतून काढून नागरिकांशी थेट संवाद साधण्यात आला. या पदयात्रेला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.यावेळी बोलताना सनी निम्हण म्हणाले, “झोपडपट्टी भागांचा विकास करताना एसआरए करायचे की नाही, हा निर्णय स्थानिक नागरिकांनीच घ्यायचा आहे. भाजप लोकांच्या भावना समजून घेऊनच विकासावर भर देतो. त्यामुळे वस्ती भागात सुधारणा करताना तसेच मूलभूत सोयी-सुविधा पुरवताना नागरिकांच्या मतांना प्राधान्य दिले जाईल.”या प्रसंगी प्रभाग क्रमांक ८ मधील भाजप–रिपाइं (आठवले) युतीचे उमेदवार परशुराम वाडेकर, भक्ति गायकवाड, सपना छाजेड यांच्यासह दोन्ही पक्षांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.