
पुणे, दि.9 :“ज्यांच्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेत, त्यांना कोणतीही चिंता नाही. विधानसभा निवडणुकीत हे आपण पाहिले असून आता महापालिका निवडणुकीतही इतिहास घडवून दाखवा,” असे आवाहन राज्याचे उपमुख्यमंत्री व शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांनी केले.प्रभाग क्रमांक ३६ सहकारनगर–पद्मावती येथे शिवसेनेचे अधिकृत उमेदवार आबा बागुल यांच्यासह बाळासाहेब उर्फ मच्छिंद्र ढवळे, पूनम हरीश परदेशी आणि नयना नितीन लगस यांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य रॅलीत शिंदे बोलत होते. यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत अभिवादन केले.सहकारनगर–पद्मावती परिसरात काढण्यात आलेल्या प्रचार रॅलीला नागरिकांनी मोठ्या उत्साहात प्रतिसाद दिला. विशेषतः “लाडक्या बहिणी राहणार एकनाथ शिंदे यांच्या उमेदवारांच्या पाठीशी” या महिलांच्या घोषणांनी परिसर भगवेमय झाला. या घोषणांना उपस्थितांनीच नव्हे तर खुद्द उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही दाद दिली.यावेळी शिंदे म्हणाले की, आबा बागुल यांनी विविध विकास प्रकल्पांच्या माध्यमातून प्रभागात अढळ विश्वास निर्माण केला आहे. पायाभूत सुविधा, नागरी समस्या, पुनर्विकास अशा सर्व कामांसाठी नगरविकास विभागामार्फत भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल. मात्र त्यासाठी आबा बागुल यांना सातव्यांदा महापालिकेत पाठवून इतिहास घडवा, असे आवाहन त्यांनी मतदारांना केले.तत्पूर्वी क्रांतिसूर्य महात्मा फुले चौक येथे झालेल्या सभेत उद्योग मंत्री उदय सामंत यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थित असलेल्या महिला व युवकांचा उत्साह पाहता परिवर्तन अटळ असल्याचे स्पष्ट केले.“आबा बागुल यांचा प्रभाग पाहण्यासाठी लोक बाहेरून येतात. पुण्यातील प्रत्येक प्रभाग आबा बागुल यांच्या प्रभागासारखा व्हावा, हेच आमचे ध्येय आहे,” असे ते म्हणाले.वाहतूक, पाणी, आरोग्य यांसारख्या प्रश्नांवर शिवसेना कटिबद्ध असून पुण्याच्या विकासाला गती देण्यासाठी आबा बागुल सज्ज आहेत. झोपडपट्टीवासीयांना हक्काची घरे देण्यासाठी नगरविकास खाते असलेले उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हेच दिलासा देतील, असे सांगत ५०० चौ.फुट घरांचा मिळकतकर माफ करण्याची घोषणाही उदय सामंत यांनी केली. उद्योगभवन पुण्यात उभारण्यासाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी जाहीर केले.उमेदवार आबा बागुल यांनी सांगितले की, येत्या १५ तारखेला मतदान करताना फक्त ‘धनुष्यबाण’ चिन्हासमोरील बटन दाबा. शिवसेना म्हणजे सर्वांगीण विकास, हे लक्षात ठेवा.निश्चिंत रहा… सर्व मागण्या मार्गी लागतीलयावेळी आबा बागुल यांनी प्रभागातील आरक्षित जागांवर विविध विकास प्रकल्पांसाठी मागणीचे निवेदन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना सादर केले. त्यावर शिंदे यांनी तळजाई टेकडी येथे ३०० बेडचे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल, राजीव गांधी ई-लर्निंग स्कूलच्या धर्तीवर नवीन शाळा, तसेच वाळवेकर नगर येथे अत्याधुनिक इंजिनिअरिंग कॉलेज (मोफत/सवलतीत शिक्षण) सुरू करण्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्वासन दिले.शहर झोपडपट्टीमुक्त करण्यासाठी स्वयंपुनर्विकासातून हक्काची घरे, शाहू वसाहतीच्या एसआरए प्रकल्पाबाबत दिलासा, तसेच एचसीएमटीआर (रिंग रोड) प्रकल्पाला गती देण्याचा निर्णय होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.