
पुणे : स्वच्छ, सुंदर आणि विकसित कसबा या संकल्पनेला बळ देण्यासाठी आमदार हेमंतभाऊ रासने यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक २५, शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई परिसरात राबविण्यात येणारे ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ अभियान निवडणूक काळातही अविरत सुरू असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली.प्रभागातील स्वच्छतेच्या गरजा लक्षात घेऊन सुरू करण्यात आलेल्या या अभियानाचा प्रचाराच्या धामधुमीतही बाप्पु मानकर यांनी नियमित आढावा घेतला. नागरिकांकडून येणाऱ्या अस्वच्छतेविषयक तक्रारी, त्यांचे तात्काळ निराकरण आणि लागणारा कालावधी याबाबत त्यांनी माहिती घेतली. तसेच स्वच्छता सेवकांच्या आरोग्याचीही त्यांनी विचारपूस केली.निवडणुकीची घोषणा झाल्यानंतरही निवडणूक आयोगाच्या नियमांचे काटेकोर पालन करत हे अभियान सुरू ठेवण्यात आले आहे. त्यामुळे निवडणूक काळात विकासकामे थांबतात हा गैरसमज खोडून काढण्यात ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ यशस्वी ठरत आहे.“निवडणूक आली की हे अभियान बंद होईल असे वाटले होते. मात्र आमच्या शनिवार पेठ भागात आज पाचव्यांदा ‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’ टीम स्वच्छता करत आहे. हे अभियान नियमितपणे राबवले जाईल, अशी ग्वाही बाप्पु मानकर यांनी आम्हाला दिली आहे,” असे मत नागरिक जयेश पंडित यांनी व्यक्त केले.‘मिशन स्वच्छ प्रभाग २५’च्या माध्यमातून अनेक रस्ते आणि अरुंद गल्ल्या स्वच्छ करण्यात आल्या आहेत. अभियानाच्या सुरुवातीला कचऱ्याची योग्य विल्हेवाट लागावी यासाठी डस्टबिनचे वाटप करण्यात आले. आजवर तब्बल ८० टन कचरा उचलण्यात आला असल्याची माहिती राघवेंद्र बाप्पु मानकर यांनी दिली.