
पुणे, : देशासमोर उभा असलेला सर्वात गंभीर प्रश्न म्हणजे पाणी संवर्धन असून, जगभरात पाण्याची भीषण टंचाई कमी-अधिक प्रमाणात जाणवत आहे. जागतिक, राष्ट्रीय, प्रादेशिक आणि स्थानिक पातळीवर पाणी प्रश्नाचा सखोल विचार होणे अत्यावश्यक आहे. भविष्यातील पिढ्यांसाठी पाणी जतन करणे ही काळाची गरज असून पाणी आणि शेतीशिवाय मानवजातीचे अस्तित्व शक्य नाही, असे प्रतिपादन ऋषीहूड युनिव्हर्सिटीचे कुलपती तसेच माजी रेल्वेमंत्री डॉ. सुरेश प्रभू यांनी केले.
महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा प्रतिष्ठेचा ‘जलमित्र पुरस्कार’ यंदा आंतरराष्ट्रीय जलाशय संवर्धन समितीचे अध्यक्ष, तसेच ओडिशातील भुवनेश्वर येथील चिलिका विकास प्राधिकरणाचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी आणि निवृत्त सनदी वनाधिकारी (IFS) डॉ. अजित पटनाईक यांना प्रदान करण्यात आला. जलसंधारण व पर्यावरण रक्षणाच्या क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेत हा सन्मान देण्यात आला.
याच कार्यक्रमात, ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ डॉ. मोहन धारिया यांच्या जन्मशताब्दी निमित्त महाराष्ट्र विकास केंद्राच्या वतीने पर्यावरण क्षेत्रातील त्यांच्या अतुलनीय योगदानाबद्दल लक्षवेधी सन्मान (मरणोत्तर) देऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.