
पुणे, दि. १५ : कात्रज–कोंढवा मार्गाचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात येईल. मेट्रोच्या माध्यमातून कोंढवा परिसर पुण्याच्या इतर भागांशी जोडण्यात येणार असून शिवाजीनगर–येवलेवाडी मेट्रो मार्गाला मान्यता देण्यात आली आहे. तसेच स्वारगेट–कात्रज मेट्रो मार्ग कोंढव्यापर्यंत वाढवणे आणि पुरंदर विमानतळाशी जोडणाऱ्या प्रस्तावित मेट्रोद्वारे या भागाचा सर्वांगीण विकास साधण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
कोंढवा बु. येथे श्री भैरवनाथ ग्रामविकास मंडळाच्या वतीने उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या लोकार्पणप्रसंगी मुख्यमंत्री बोलत होते. यावेळी उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार योगेश टिळेकर, भीमराव तापकीर, सुनील कांबळे, चेतन तुपे तसेच मंडळाचे पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी महाराष्ट्राला स्वाभिमान आणि समतेचे मूल्य शिकवले. स्त्रियांवर अन्याय करणाऱ्यांना कठोर शिक्षा देणारे त्यांचे शासन होते. त्यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या कोंढव्याच्या भूमीत भव्य अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण होत असल्याचा आनंद आहे. या पुतळ्यामुळे कोंढवा परिसरासह संपूर्ण महाराष्ट्राचे वैभव वाढले आहे.
मोगलशाही, निजामशाही व आदिलशाहीच्या आक्रमणांच्या काळात जिजाऊ मासाहेबांच्या संस्कारातून शिवाजी महाराजांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली. अठरापगड जातींना एकत्र करून स्वराज्य उभे केले. पुढे छत्रपती संभाजी महाराजांनी स्वराज्याचे रक्षण केले आणि ताराराणींच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी दिल्लीचे तख्त काबीज करत अटकेपार झेंडा फडकावला, असेही मुख्यमंत्री म्हणाले. शिवाजी महाराजांचा जाज्वल इतिहास सीबीएसईच्या अभ्यासक्रमात २१ पानांत समाविष्ट केल्याचेही त्यांनी नमूद केले.
आमदार योगेश टिळेकर यांनी सांगितले की, शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत अश्वारूढ पुतळ्याचे लोकार्पण हा अभिमानाचा क्षण आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून कोंढवा परिसराचा पायाभूत विकास वेगाने सुरू आहे