
पुणे दि. 8 : काही दिवसांपूर्वीच हिंदी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते आणि चाहत्यांच्या मनातील ‘ही-मॅन’ धर्मेंद्र यांनी सर्वांना निरोप दिला. गेल्या अनेक दिवसांपासून ते प्रकृती अस्वस्थतेशी झुंज देत होते. मात्र अखेरीस त्यांनी जगाला कायमचा अलविदा केला. त्यांच्या जाण्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला. पण सर्वांत वेदनादायक बाब म्हणजे, चाहत्यांना आपल्या लाडक्या अभिनेत्याचं अंत्यदर्शनही घेता आलं नाही.
देओल कुटुंबीयांनी कोणालाही माहिती न देता अतिशय शांततेत आणि घाईघाईत अंत्यसंस्कार पार पाडल्यामुळे अनेक प्रश्न उपस्थित झाले. धर्मेंद्र यांना राजकीय सन्मान मिळायला हवा होता, पण अंत्यसंस्कार तत्काळ केल्याने तेसुद्धा शक्य झालं नाही. अखेर हे असं का घडलं? याचे उत्तर आता त्यांच्या दुसऱ्या पत्नी, दिग्गज अभिनेत्री हेमा मालिनी यांनी दिलं आहे.
चित्रपट निर्माते हमद अल रायमी यांनी हेमा मालिनी यांना भेटल्यानंतर केलेल्या पोस्टमध्ये या सर्व घडामोडींचा उल्लेख आहे. त्यांनी लिहिले आहे की, शोकाच्या तिसऱ्या दिवशी त्यांनी प्रथमच हेमा मालिनी यांना प्रत्यक्ष भेटले आणि त्या क्षणी त्यांच्या चेहऱ्यावर दिसणारे दुःख शब्दात मावणारे नव्हते.
धर्मेंद्र यांच्याबद्दल बोलताना हेमा मालिनी भावुक झाल्या. त्यांनी सांगितले की,
“धर्मेंद्र यांना त्यांच्या आयुष्यात कधीही कोणी त्यांना कमकुवत किंवा आजारी पाहावं असं वाटत नव्हतं. त्यांनी आयुष्यभर आपलं दुःख लपवलं. शेवटच्या दिवसांत त्यांची तब्येत अत्यंत ढासळली होती. त्यांची वेदना आम्हीही सहन करू शकत नव्हतो.”
चाहत्यांना अंत्यदर्शन न देता अंत्यसंस्कार लवकर करण्यामागचं कारण सांगताना त्या म्हणाल्या,
“जे काही केलं ते पूर्ण दयेने… तुम्हाला त्यांना त्या अवस्थेत पाहवणार नव्हतं…”
चाहत्यांना शेवटचं दर्शन घेता न आल्याचं दुःख त्यांनाही खूप होत असल्याचे त्यांनी नमूद केले.