
पुणे दि. 8 : राज्यातील विविध भागांत गेल्या काही दिवसांपासून बिबट्या आणि वाघांच्या हालचालींमध्ये वाढ झाली आहे. अनेक ठिकाणी जनावरांवर हल्ले होत असून, काही दुर्दैवी प्रसंगांमध्ये मानवांवरही हल्ले होऊन मृत्यू झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. या वाढत्या घटनांमुळे ग्रामीण भागात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
या हल्ल्यांमधून कुटुंबातील कर्ता पुरुष गमावलेल्या अनेक घरांची परिस्थिती अत्यंत बिकट बनली आहे. त्याची दखल घेत महाराष्ट्र सरकार आता अशा कुटुंबांना मदत करण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याच्या तयारीत आहे.
मृत व्यक्तीच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना वन विभागात सरकारी नोकरी देण्याचा प्रस्ताव विचाराधीन असल्याची माहिती विभागातील वरिष्ठ सूत्रांनी दिली आहे. हा निर्णय लवकरच अंतिम होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
सरकारच्या या उपक्रमामुळे वन्यप्राण्यांच्या हल्ल्यातून संकटात सापडलेल्या कुटुंबांना स्थिर रोजगार मिळण्याचा मार्ग मोकळा होऊ शकतो, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.