
पुणे, दि. 4 : सांगली जिल्ह्यातील आष्टा नगरपरिषद निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढल्याचा दावा अधिकृतपणे करण्यात आला असला, तरी या वाढीवरून मोठा वाद पेटला आहे. जाहीर केलेल्या आकडेवारीत आणि प्रत्यक्ष मतदानात तब्बल २,००० मतांची तफावत असल्याचा गंभीर आरोप महाविकास आघाडीच्या (शरद पवार गट) कार्यकर्त्यांकडून करण्यात आला आहे.
मतदान प्रक्रिया पार पडल्यानंतर जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीतील ही कथित विसंगती समोर आल्यानंतर शहरात खळबळ उडाली. या विरोधात महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी ईव्हीएम ठेवलेल्या स्ट्राँगरूमबाहेर घोषणाबाजी आणि ठिय्या आंदोलन करत निवडणूक प्रक्रियेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले.
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे नेते जयंत पाटील यांनी देखील मतदानाच्या आकडेवारीतील तफावत आणि ईव्हीएमच्या सुरक्षिततेबाबत शंका उपस्थित करतून निवडणूक आयोगाने तातडीने चौकशी करावी, अशी मागणी केली आहे.
एकूणच, मतदानाचा टक्का वाढला असला तरी या वाढीमागील तफावत आता तीव्र राजकीय वादाचा विषय ठरली असून आष्टा शहरात वातावरण तंग आहे.