
पुणे दि. 25 : राम मंदिराच्या शिखरासाठी तयार करण्यात आलेली दिव्य धर्मध्वजा अखेर जन्मभूमी अयोध्येत पोहोचली असून, २५ नोव्हेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी प्रथमच १९१ फूट उंच शिखरावर या ध्वजेचे ध्वजारोहण करणार आहेत. या ऐतिहासिक क्षणासाठी विशेष तयारी करण्यात आली आहे. संपूर्ण देशाचे लक्ष या कार्यक्रमावर केंद्रित झाले आहे. मात्र शंकराचार्यांना या सोहळ्यास आमंत्रण न पाठविल्याने नवी चर्चा आणि वाद निर्माण झाला आहे.
ज्योतिर्मठाचे शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी ध्वजारोहणावरील विधींविषयी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यांचे म्हणणे आहे की शास्त्रांमध्ये ‘ध्वजारोहण’ असा उल्लेख नाही, तर मंदिराच्या शिखराची विधिवत प्रतिष्ठा करणे अनिवार्य मानले जाते. त्यांनी सांगितले की, “शास्त्रीय परंपरेनुसार विधी नसताना अशा कार्यक्रमात सहभागी होण्याचा अर्थ नाही.” त्यांनी पुढे उल्लेख केला की, जगन्नाथ मंदिर आणि द्वारका येथे ध्वज बदलण्याची परंपरा असली तरी जमीनवरून चढून ध्वज फडकवण्याचे उदाहरण नाही. तसेच शिखर प्रतिष्ठेशिवाय ध्वजा बदलणे अपूर्ण समजले जाते, असा त्यांचा ठाम दावा आहे.
दरम्यान, राम मंदिर ट्रस्टने मंदिर बांधणीत २ कोटी रुपये किंवा त्याहून अधिक योगदान देणाऱ्या १०० प्रमुख दात्यांना विशेष आमंत्रण पाठवले आहे. याशिवाय लखनऊ, अयोध्या आणि परिसरातील २५ जिल्ह्यांतील शेतकरी आणि नागरिकांनाही सामील करण्याचा विशेष प्रयत्न असल्याचे सांगितले जाते. यामुळे कार्यक्रम अधिक व्यापक आणि भव्य स्वरूपात आयोजित केला जात आहे.
धर्मध्वजा अद्वितीय शिल्पकलेचे प्रतीक आहे.
गुजरातमधील ६ कुशल कारागिरांनी तब्बल २५ दिवस मेहनत घेऊन ही त्रिस्तरीय ध्वजा तयार केली आहे. ११ फूट रुंद व २२ फूट लांबीच्या या ध्वजेचा केशरिया रंग सूर्योदयाच्या लालिमेसारखा तेजस्वी आहे. यात सूर्यदेव, ‘ॐ’ आणि कोविदार वृक्षाचे चिन्ह अंकित असून त्याने ध्वजाची पवित्रता अधिक वाढवली आहे. विशेष पॅराशूट फॅब्रिक, रेशमी धागे आणि शिखराच्या उंचीला अनुरूप मजबूत नायलॉन दोरी यामुळे हा ध्वज अधिक टिकाऊ बनवला आहे. ध्वजदंडासाठी खास बॉल बेअरिंगयुक्त फिरणाऱ्या चेंबरची रचना केली आहे, ज्यामुळे जोरदार वाऱ्यातही ध्वज सुरक्षित राहील.

२५ नोव्हेंबर रोजीच्या कार्यक्रमादरम्यान सामान्य भक्तांसाठी रामलला दर्शन बंद ठेवण्यात आले आहे. याच दिवशी अयोध्येत गर्दी टाळण्यासाठी प्रशासनाने आवाहन केले आहे. तसेच २३ नोव्हेंबरच्या रात्रीपासून २६ नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपर्यंत जड वाहनांच्या प्रवेशावर बंदी असेल.
पंतप्रधानांचे हेलिकॉप्टर साकेत महाविद्यालयात उतरणार असून तिथून ते रस्तेमार्गे मंदिर परिसरात पोहोचतील. सेना व SPGच्या पथकांनी सतत सुरक्षा आढावा घेतला असून २३ नोव्हेंबर रोजी हेलिकॉप्टरद्वारे हवाई पाहणीही करण्यात आली आहे. राम जन्मभूमी परिसरात उच्चस्तरीय सुरक्षेची विशेष व्यवस्था करण्यात आली आहे.