
पुणे दि. 8 : भारताच्या ऐतिहासिक विजयानंतर महिला क्रिकेट संघाचे सर्वत्र कौतुक होत आहे. या विजयानंतर वर्ल्डकप विजेत्या भारतीय महिला संघातील महाराष्ट्रातील तीन खेळाडू — स्मृती मंधाना, जेमीमा रॉड्रिग्ज आणि राधा यादव — यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (7 नोव्हेंबर) सत्कार करण्यात आला.
मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी झालेल्या या कार्यक्रमात तिन्ही खेळाडूंना 2 कोटी 25 लाख रुपयांचे रोख बक्षीस प्रदान करण्यात आले.
या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले, “स्मृती, जेमीमा आणि राधा या तिघी महाराष्ट्राचा अभिमान आहेत. भारतीय महिला संघाने वर्ल्डकप जिंकून केवळ क्रीडा क्षेत्रात नव्हे तर देशातील लाखो मुलींना प्रेरणा दिली आहे. त्यांनी जगभर भारताचे नाव उज्ज्वल केले आहे.”
या वेळी स्मृती मंधाना म्हणाली, “आमचा सन्मान केल्याबद्दल राज्य सरकारचे मनःपूर्वक आभार. महाराष्ट्राने कायम आमची साथ दिली आहे. 2017 साली उपविजेते ठरल्यानंतरही राज्य सरकारने आम्हाला सन्मानित केलं होतं. हा सन्मान आम्हाला नव्या जोमाने पुढे खेळण्यासाठी प्रेरणा देतो.”