मुंबई दि. 30 : महाराष्ट्रातील कार्यकाळ संपणाऱ्या तब्बल १४,२३७ ग्रामपंचायतींच्या निवडणुका किमान सहा महिने पुढे ढकलण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. ग्रामविकास विभागाने यासंदर्भात आदेश जारी करत जिल्हाधिकाऱ्यांना आणि जिल्हा परिषद प्रशासनाला पुढील कार्यवाही करण्याचे निर्देश दिले आहेत.जानेवारी ते डिसेंबर २०२६ दरम्यान ज्या ग्रामपंचायतींचा कार्यकाळ संपणार आहे, त्या सर्व ठिकाणी निवडणुका घेण्याऐवजी तात्पुरत्या स्वरूपात प्रशासकांची नियुक्ती केली जाणार आहे. हा निर्णय १४ ऑगस्ट २०२० च्या शासन आदेशानुसार घेण्यात येणार असून त्यासाठी जिल्हास्तरावर प्रक्रिया सुरू झाली आहे.सूत्रांच्या माहितीनुसार, प्रभाग रचना, आरक्षण व इतर तांत्रिक प्रक्रियांमुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये विलंब होत आहे. त्यामुळे निवडणुका तातडीने घेणे शक्य नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.मुंबई उच्च न्यायालयाच्या पूर्वीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, या ग्रामपंचायतींवर खासगी व्यक्तींऐवजी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी (जसे विस्तार अधिकारी, ग्रामसेवक) यांची प्रशासक म्हणून नेमणूक होण्याची शक्यता आहे.या निर्णयामुळे राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक प्रक्रियेवर मोठा परिणाम होणार असून, ग्रामीण भागातील प्रशासन तात्पुरत्या स्वरूपात अधिकाऱ्यांच्या हाती जाणार आहे.