
पुणे दि. ६ : आगामी लातूर महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी केलेल्या एका विधानामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. ५ जानेवारी २०२६ रोजी लातूर येथे झालेल्या भाजपच्या कार्यकर्ता मेळाव्यात बोलताना चव्हाण यांनी माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांच्याबाबत वादग्रस्त विधान केल्याने मोठा वाद निर्माण झाला आहे.
कार्यकर्त्यांचा उत्साह पाहून चव्हाण म्हणाले, “तुमचा उत्साह बघता, लातूर शहरातून विलासराव देशमुखांच्या आठवणी १०० टक्के पुसल्या जातील यात शंका नाही.” हे विधान त्यांनी कार्यकर्त्यांना घोषणा देण्याचे आवाहन केल्यानंतर केले.
या वक्तव्यावर काँग्रेसकडून तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. विलासराव देशमुख यांचे सुपुत्र व आमदार अमित देशमुख यांनी या विधानाचा निषेध करत ते दुर्दैवी, असंवेदनशील आणि लातूरच्या संस्कृतीला न शोभणारे असल्याचे म्हटले. त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, लातूरच्या जनतेच्या मनातून विलासराव देशमुख यांचे योगदान कधीही पुसले जाऊ शकत नाही.
दरम्यान, अभिनेता रितेश देशमुख यांनीही सोशल मीडियावर अप्रत्यक्ष शब्दांत प्रतिक्रिया देत वडिलांच्या कार्याचा उल्लेख केला असून त्यांच्या योगदानावर लातूरकरांचा कायम विश्वास असल्याचे संकेत दिले आहेत.
काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांच्यासह पक्षाच्या इतर नेत्यांनी भाजपवर द्वेषाचे राजकारण केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी सांगितले की, विकासाऐवजी इतिहास पुसण्याची भाषा करणारे नेते जनतेच्या प्रश्नांपासून पळ काढत आहेत.
या विधानाच्या निषेधार्थ लातूरमध्ये काँग्रेस कार्यकर्त्यांनी निदर्शने करत रवींद्र चव्हाण यांनी जाहीर माफी मागावी, अशी मागणी केली आहे. महानगरपालिका निवडणूक १५ जानेवारी २०२६ रोजी होणार असून, या विधानामुळे निवडणूक प्रचार अधिकच तापण्याची चिन्हे दिसत आहेत.