
पुणे दि. 28 :देशाच्या आर्थिक विकासात सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. आज सरकारी बँकांमध्ये सर्वसामान्य नागरिकांचा २५ लाख कोटी रुपयांहून अधिक निधी सुरक्षित आहे. मात्र केंद्र सरकार परकीय भांडवलदारांना प्राधान्य देत बँकांचे खासगीकरण करण्याचे धोरण राबवत आहे. हे धोरण देशाच्या आर्थिक विकासाला मारक असून त्याविरोधातील लढा अधिक तीव्र करावा लागेल, असे ठाम मत ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशन (AIBEA) चे महासचिव कॉ. सी. एच. वेंकटचलम यांनी व्यक्त केले.
ऑल इंडिया बँक एम्प्लॉईज असोसिएशनशी संलग्न ऑल इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज फेडरेशन (AIBOMEF) च्या दोन दिवसीय नवव्या अखिल भारतीय अधिवेशनाचे उद्घाटन शनिवारी पुण्यात पार पडले. बीएमसीसी रस्त्यावरील दादासाहेब दरोडे सभागृहात आयोजित या कार्यक्रमात देशभरातून ६०० हून अधिक बँक कर्मचारी सहभागी झाले होते.
या वेळी अर्थपत्रकारितेतील उल्लेखनीय योगदानाबद्दल ज्येष्ठ पत्रकार व मनीलाईफ फाऊंडेशनच्या संस्थापिका, पद्मश्री सुचेता दलाल यांना ‘कॉ. सुरेश धोपेश्वरकर स्मृती पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.
कार्यक्रमास बँक ऑफ महाराष्ट्रचे निधू सक्सेना, बँक ऑफ इंडियाचे व्ही. सी. जोशी, बँक ऑफ महाराष्ट्रचे कॉ. कृष्णा बरुरकर, ‘एआयबीईए’चे उपाध्यक्ष कॉ. एन. शंकर, महासचिव देवीदास तुळजापूरकर, संयुक्त सरचिटणीस कॉ. ललिता जोशी, तसेच संयोजक शैलेश टिळेकर आदी मान्यवर उपस्थित होते