
पुणे दि. 24 : केंद्र सरकारच्या महत्त्वाकांक्षी आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (PM-JAY) अंतर्गत नागरिकांना मिळणाऱ्या आरोग्य कव्हरमध्ये मोठी वाढ करण्यात आली आहे. वाढत्या उपचार खर्चाच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या या निर्णयामुळे देशभरातील लाखो कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे. नव्या बदलांमुळे लाभार्थ्यांना गंभीर आजारांच्या उपचारांवरील आर्थिक भार कमी होणार असून अधिक व्यापक आणि सुरक्षित आरोग्य संरक्षण उपलब्ध होणार आहे.
आयुष्मान भारत PM-JAY ही देशातील सर्वात मोठी आरोग्य विमा योजना असून आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबांना मोफत उपचार सुविधा देण्यावर तिचा भर आहे. या योजनेअंतर्गत पात्र कुटुंबांना वर्षाकाठी 5 लाख रुपयांपर्यंतचे कॅशलेस आणि पेपरलेस आरोग्य विमा संरक्षण मिळते. देशभरातील हजारो हॉस्पिटलमध्ये या योजनेअंतर्गत उपचार मिळू शकतात.सरकारने या योजनेत एक बदल केला आहे. आता 70 वर्षांवरील प्रत्येक सदस्याला अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळणार आहे. जर एखादे कुटुंबाने या योजनेसाठी आधीच नोंदणी केली असेल आणि त्या घरात एखाद्या सदस्याचे वय 70 वर्षांपेक्षा जास्त असेल, तर त्यांना अतिरिक्त 5 लाख रुपयांचा आरोग्य विमा मिळेल. अशाप्रकारे या कुटुंबाला 10 लाखांचे कव्हर मिळेल.
या योजनेचे वैशिष्ट्य म्हणजे गंभीर आजारांवरील उपचार पहिल्या दिवसापासून कव्हर केले जातात. कुटुंबातील सदस्य संख्या किंवा वयोमर्यादेची अट नसल्याने योजनेचा लाभ संपूर्ण कुटुंबाला मिळतो. यात पती-पत्नी, मुलं, आई-वडील, आजी-आजोबा, भाऊ-बहिण यांसह पात्र असलेल्या इतर सदस्यांचाही समावेश केला जातो. त्यामुळे ही योजना अनेकांसाठी आरोग्य सुरक्षेचा मजबूत आधार बनली आहे.