
पुणे, दि. 12 : नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक संरक्षण देण्यासाठी केंद्र सरकारतर्फे प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. रब्बी हंगाम 2025-26 साठी गहू (बागायत), रबी ज्वारी (बागायत व जिरायत), हरभरा, रब्बी कांदा आणि उन्हाळी भुईमूग ही पिके या योजनेत समाविष्ट करण्यात आली आहेत.
या योजनेत सहभागी होण्यासाठी नोंदणी प्रक्रिया राष्ट्रीय पिक विमा पोर्टल www.pmfby.gov.in
वर 1 नोव्हेंबर 2025 पासून सुरू करण्यात आली आहे.
ज्वारी पिकासाठी नोंदणीची अंतिम तारीख 30 नोव्हेंबर 2025, गहू, हरभरा आणि कांदा पिकांसाठी 15 डिसेंबर 2025, तर उन्हाळी भुईमूग पिकासाठी 31 मार्च 2026 अशी ठेवण्यात आली आहे.
अधिक माहितीसाठी किंवा नुकसान भरपाईच्या तपशीलांसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन क्रमांक 14447 वर संपर्क साधावा. तसेच भारतीय कृषि विमा कंपनी किंवा स्थानिक कृषि विभागाच्या कार्यालयाशीही संपर्क साधता येईल.
सविस्तर माहितीसाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या कृषि विभागाच्या संकेतस्थळावर www.krishi.maharashtra.gov.in
वर पाहता येईल.
शेतकऱ्यांनी जवळच्या ई-सेवा केंद्र किंवा वित्तीय संस्थांमार्फत सहभाग नोंदवावा, तसेच संबंधित उपविभागीय कृषि अधिकारी किंवा तालुका कृषि अधिकारी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.